"सेवा देण्याची वृत्ती अंगी असावी लागते. तुम्ही जेव्हा इतरांचा विकास करण्यासाठी मदत करतात तेव्हा त्यांच्या जोडीने तुमचाही विकास होतो " असे डेव्हिड ग्रीन यांनी म्हटलं आहे.
सेवा हा संस्कृत शब्द आहे. सेवेला त्यागाची जोड दिल्यास आपली सेवा अधिक परिपूर्ण होऊ शकते. आपला समाज, शहर किंवा देश यांची सेवा करून आपण आपल्या निस्वार्थीपणाचा परीघ आपल्या कुटुंबापलीकडे विस्तारू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निलेश भगवान सांबरे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली या छोट्याशा गावापासून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करणारे निलेश सांबरे आज कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये अगदी निस्पृहपणे सेवा करत आहेत.
ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने प्रेरित होऊन कोकणचा कॅलिफोर्निया निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, महिला सक्षमीकरण, क्रीडा व विविध सामाजिक क्षेत्रात निलेश सांबरे अगदी अविरतपणे काम करत आहेत.
कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गाचं वरदान लाभलेला विस्तीर्ण भूप्रदेश. मात्र निसर्गाने सर्वकाही देऊन सुद्धा सर्वांगीण विकासापासून वंचित राहिलेल्या या कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा आणि येथील सर्व लोकांच्या सक्षमीकरणाचा वसा घेऊन निलेश सांबरे हे अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या स्वकमाईतून गेली १२ वर्षे त्यांची जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अगदी प्रभावीपणे कार्यरत आहे.
समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीनुसार जिजाऊची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आर्थिक स्थितीमुळे कोकणातील एकही तरुण शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध मोफत उपक्रम राबवले जातात. एकही रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सुविधांअभावी दगावला जाऊ नये, यासाठी मोफत सुसज्ज रुग्णालय, रुग्णवाहिका सेवा चालवण्याबरोबरच आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं नियमित आयोजित केली जातात. कुपोषणापासून मुक्तीसाठी खास प्रयत्न सुरु असतात. प्रत्येक रिकाम्या हाताला काम मिळावे, यासाठी कौशल्य विकासाचा प्रयत्न असतो. त्यासाठी रोजगार साधने आणि खास प्रशिक्षणाचा प्रयत्नही असतो. निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती ही तोट्यात जाऊ नये, ती जोडधंद्यांसह फायद्याची व्हावी यासाठी सतत काम सुरु असते. त्यासाठी फळरोपे, फुलझाडे वाटपाबरोबरच इतरही उपक्रम राबवले जातात. कोकणामध्ये शेतकरी विकास नद्यांना बंधारे बांधून बारमाही शेतीकरुन - तसेच दुग्ध व्यवसायास चालना देऊन सुजलाम सुफलाम बनवुन कुपोषणमुक्त कोकण घडविण्याचा त्यांचा मानस आहे. कोकणातील महिला या हिरकणीचा वारसा सांगणाऱ्या महिला असून अशा हिंमतवान मायभगिनींना सक्षम बनवलं तर कोकणाच्या सक्षमीकरणास मदत होईल. त्यामुळेच त्यांच्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे विविध उपक्रम राबवले जातात.
कोकणातून अधिकारी घडवण्याचे लक्ष्य!
कुपोषण आणि आर्थिक मागासलेपणामुळे कोकणातील तरुण प्रशासकीय सेवेत जात नाही किंबहुना प्रशासकीय सेवेतील त्यांचे प्रमाण खूपच हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी तयार करणे असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. कोकणातील तरुणांना विनामूल्य पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे.
वैद्यकीय सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न...
झडपोली येथे श्री.भगवान महादेव सांबरे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्यात आले असून
येथे २४ तास मोफत सुविधा उपलब्ध आहे. सुसज्ज १०० बेड्सचे रुग्णालय, महिला व बालकांसाठी विशेष कक्ष, कार्डिॲक रुग्णवाहिकेसहित, एक्स-रे, सोनोग्राफी, डायलीसिस, महिला प्रसुतीगृह इ. अत्याधुनिक वैद्यकिय सेवा उपलब्ध उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसंदिवस महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने पालघर व ठाणे येथील महिलांना कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यात आली आणि दोन्ही जिल्ह्यांमधील महिलांच्या कॅन्सर तपासणीसाठी प्रतिवर्षी १०० शिबीरे घेण्यात येत आहेत. तसेच महिलांना व १५०० हुन अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना टाटा हॉस्पीटलच्या व इतर विविध रुग्णालयांच्या माध्यमातुन यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने निलेश सांबरे यांच्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थे मार्फत संपूर्ण ठाणे, पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, गायन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा व हळदी कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
त्यांचे व्यक्तिगत जीवन हे सुख दुःखाचे जाळे म्हणता येईल. समाजाप्रती असलेल्या आस्थेमुळे त्यांचा स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक जण स्वतःसाठीच जगतात, स्वतःच्या कुटुंबियांसाठी मेहनत व काबाडकष्ट करतात. काहीजण प्रचंड माया जमवून त्यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. पण स्वतः बरोबरच समाजासाठी, आपल्या परिसरासाठी किंबहुना राष्ट्रासाठी जगणारे काही मोजकेच अपवाद असतात. सामाजिक आणि व्यक्तिगत असे मानवी जीवनाचे दोन मार्ग असतात. सार्वजनिक जीवनात समता, मानवता आणि न्यायमूल्यांचा आविष्कार असतो तर दुसरा मानवी तत्त्व मूल्यांची जपणूक करतात. अशा सामाजिक, शैक्षणिक, सहकार व आर्थिक बाबींची जाण ठेवून कार्यरत असणारे निलेश सांबरे यांच्या कार्याला त्रिवार सलाम!
शेवटी समर्थांच्या शब्दात सांगायचे तर....
" निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारु!
अखंड कीर्ती निर्धारु! श्रीमंत योगी!!
यशवंत किर्तीवंत! सामर्थ्यवंत वरदवंत!
पुण्यवंत आणि जयवंत ! सच्चा कर्मयोगी!!"
- प्रमोद पाटील
शिक्षण अभ्यासक
तथा
माजी अध्यक्ष/ माजी विश्वस्त
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका
खुप छान लेख आहे सर मा.सांबरे साहेबांचे वास्तव कार्य डोळ्यांसमोर मांडणारा अप्रतिम लेख
ReplyDelete