राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त स्मरणार्थ शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या भावना ! भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !
भाऊ, हे जाण्याचं वय नव्हतं... !
राजीव सातव अर्थात माझे भाऊ! राजकारणातील माझे सच्चे मित्र, अनुभवी सहकारी, निर्व्याज मार्गदर्शक आणि मोठे बंधू !
भाऊ आपल्यात नाहीत हे स्वीकारायला मन आजही तयार नाही. मा. राहुलजींनी भाऊंना श्रद्धांजली अर्पण करताना एका प्रसंगाचा उल्लेख केला होता- युवक काँग्रेसच्या टॅलेन्ट हंट या कार्यक्रमासाठी देशभरातून काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बोलविण्यात आले होते. यामध्ये सगळ्यांत चांगला कार्यकर्ता कोण याविषयी राहूलजींनी विचारणा केली, त्यावेळी राजीवजींनी त्यांपैकी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले. त्यानंतर दुसरा नंबर कोणाचा असे विचारल्यावर त्यांनी आणखी एका कार्यकर्त्याचे नाव सांगितले, परंतु त्यांनी स्वत:चे नाव सांगितले नाही. तसेच त्यांनी कोणत्याही सहकाऱ्याच्या अवगुणांचा उल्लेख केला नाही. ही बाब राहूलजींना खूप भावली, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा भाऊंचा हा गुण राहूलजींनी हेरला.
राजीवजींचं आणि माझं अत्यंत निर्भेळ असं नातं होतं. आम्ही समवयीन. एखाददुसऱ्या वर्षाने पुढे-मागे. त्यांची आईकडून राजकारणाशी, काँग्रेसच्या विचारधारेशी नाळ जुळलेली तर माझी वडिलांकडून. हा काँग्रेसच्या विचारांचा वारसा सांभाळताना सामान्य माणसांशी आणि मातीशी नातं दृढ करत सर्वसमावेशक राजकारण करणं आवश्यक असतं. विश्वासार्ह माणूस आणि विश्वासार्ह लोकप्रतिनिधी बनणं महत्त्वाचं असतं. या प्रवासात समंजसपणा, सुसंवाद आणि आश्वासकता यांचा मिलाफ साधता येणं तर अगदी काही जणांनाच जमतं. राजीवजी हे अशा मोजक्या दुर्मीळ व्यक्तींपैकी एक होते. तरुण, अभ्यासू, संवेदनशील, अजातशत्रू, विचारी, प्रसन्न, चतुरस्र, वास्तवाचे भान असलेला, चौकटीच्या पलीकडे जाऊन कृती करणारा आणि दिल्लीत महाराष्ट्राची मोहोर उमटवणारा लोकप्रिय नेता, असाही त्यांचा अभिमानाने उल्लेख व्हायचा. राजकीय क्षेत्रात वावरताना माझ्यासाठी खंदे सहकारी, मार्गदर्शक व पाठीराखा भाऊ, अशीच त्यांची भूमिका होती.
राजीव सातव या नावाला राजकीय वारसा लाभला होता. पण त्याचा आधार न घेता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भाऊंनी राजकारणात पाऊल ठेवले ते पंचायत समितीच्या निवडणुकीपासून. मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या आपल्या तालुक्यापासून त्यांनी सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य, मग जिल्हा परिषद व विधान सभेत यश मिळवून पुढे खासदारकीपर्यंत भाऊंनी स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेतली. हिंगोली सारख्या अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या जिल्ह्याच्या आशाआकांक्षा समजून घेऊन त्यांना मूर्त स्वरूप देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. अशक्य ते शक्य करून दाखवणं हे भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं.
निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्याची ताकद राजीवजींमध्ये होती, हे निर्विवाद पण त्याही पलीकडे जाऊन आजच्या काळात पक्षाचा विचार जिवंत ठेवणं ही मोठी कामगिरी भाऊंनी केली. राष्ट्रीय राजकारणात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ती याचमुळे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून, नंतर गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी निभावलेली जबाबदारी लक्षणीय ठरली. प्रत्येक टप्प्यावर अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधत, यशापयशातून शिकत त्यांचं अभ्यासू नेतृत्व सदैव बहरतच गेलं.
निरीक्षण, अभ्यास आणि मांडणी या तीनही पैलूंवर भाऊंची विलक्षण पकड होती. राजकारणातले तिढे सोडवत असताना लोकांच्या प्रश्नांना महत्त्व देणं किती आवश्यक आहे, हे भाऊ जाणून होते. अगदी मूलभूत अशा शेती, रोजगार, दुष्काळ या विषयांबाबत ते सदैव जागरूक असत. समाजकारण हा राजकारणाचा पाया असतो याचं त्यांना भान होतं, त्यांनी स्वत: कायद्याचा अभ्यास केला होता. पण राजकारणासारख्या व्यस्त क्षेत्रात असूनही शिक्षणाची नाळ तुटू दिली नाही. अगदी अलीकडच्या काळात केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना अभ्यासपूर्ण विरोध करताना त्यांनी केलेली मुद्देसूद आणि कायदेशीर मांडणी लक्षवेधी ठरली.
राष्ट्रकूल संसदीय मंडळाचा ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ स्वीकारताना मला प्रकर्षाने भाऊंची आठवण झाली. लोकांचे प्रश्न संसद अधिवेशनात मांडण्यात भाऊ नेहमीच अग्रेसर होते. मतदारसंघातील अनेक प्रश्न संसदेत मांडून ते धसास लावण्याचा प्रयत्न केला. त्यांची संसदेतील उपस्थिती उल्लेखनीय होती. या कामगिरीचा विचार करून भाऊंना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
2014 ची लोकसभा निवडणूक आणि 2017 ची गुजरात विधानसभा निवडणूक ही राजीवजींच्या उल्लेखाविना अधुरी ठरेल. यामध्ये भाऊंच्या मुत्सद्देगिरीचं, राजकीय परिपक्वतेचं, संयम आणि हिमतीचं अनोंख रूप पाहायला मिळालं. लोकसभा असो, की राज्यसभा आपल्या मतदारसंघातल्या जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. उलट काळाच्या ओघात ते ऋणानुबंध अधिक दृढ होत गेले. पालकमंत्री या नात्याने मी जेव्हा जेव्हा हिंगोलीमध्ये वावरले तेव्हा तेव्हा मला त्याची प्रचिती यायची. दिल्लीत राजीव सातव नावचं एक वलय होतं. 2014 ला एका वेगळ्या अर्थाने राजीवभाऊंच्या राजकीय कौशल्याचा आणि नैपुण्याचा कस लागला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाले.
वयाच्या अवघ्या 45-46 व्या वर्षी काँग्रेससारख्या भारताच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या राष्ट्रीय पक्षात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. पण ते काही त्यांचं ध्येय नव्हतं. खरंतर माजी मंत्री असणाऱ्या आईच्या राजकीय वारशाचा लाभ घेत मतदारसंघातलं, पक्षामधलं स्वत:चं स्थान बळकट करण्याचा सहजसोपा पर्यायही उपलब्ध होता. काँग्रेस पक्षाच्या तत्त्वांवर, घटनात्मक मूल्यांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. काँग्रेसची यंग ब्रिगेड शोधणं, घडवणं आणि नवीन पिढीस सक्रिय राजकारणात आणण्यासाठी ते झटत होते. सुसंवादाने जुन्या-नव्यांची समन्वय साधून पक्ष संघटन मजबूत करण्याचा ते सतत प्रयत्न करत होते.
व्यक्तिगत पातळीवर सर्वपक्षीय नेत्यांशी ऋणानुबंध राखणाऱ्या राजीवजींनी काँग्रेसची विचारधारा अखंड वाहती राहावी, म्हणून प्रत्येक स्तरावर अविरत प्रयत्न केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर तो अवघ्या भारताला, भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला कवेत घेऊ पाहाणारा, स्वातंत्र्य- समता- सर्वधर्मसमभाव- बंधुता या मूल्यांशी नाळ जोडणारा, माणुसकीशी नातं सांगणारा विचार आहे. आजच्या नव्या भारतातल्या तरुणाईच्या मनात हा विचार नव्या जोमाने पेरत जाण्याची गरज आहे. त्यासाठी नवे पर्याय आणि कल्पक मार्ग शोधण्याची जिगर राजीवभाऊंमध्ये होती. माझं ते खरं, माझं तेच बरोबर आणि म्हणून इतरांनी ते ऐकलंच पाहिजे असा हट्टाग्रह त्यांच्या विचारात, मांडणीत, वर्तनात कधीच नसायचा. लोकशाहीवर त्यांची निष्ठा होती. संघटनशक्तीचं मूल्य ते जाणत होते. संवाद व चर्चा करून विधायक पद्धतीने प्रश्न सोडवता येऊ शकतात यावर त्यांचा विश्वास होता. अलीकडच्या काळातल्या ध्रुवीकरणाकडे झुकू लागलेल्या वातावरणात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा विचार महत्त्वाचा होता.
मी तर माझा भाऊ गमावला आहे. कळमनुरी – माझे माहेर आज सुनेसुने झाले आहे. आई, प्रज्ञा वाहिनी, पुष्कराज व तितली यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आज गरज आहे. त्यांना कधीही एकटेपणाची जाणीव होणार नाही याची आपण काळजी घेऊ.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करते, की आज भाऊ जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार आपल्यासोबत आहे, त्यांनी उभे केलेले पक्षसंघटन आणि आपल्या सारख्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी सोबत आहे. मी आणि पक्षसंघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच या सर्वांच्या मदतीने आपण पुन्हा जोमाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया.
Comments
Post a Comment