प्रमोद पाटील (पालघर)
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे.
बालकवींनी श्रावण महिन्याचे अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितेमध्ये केले आहे.
भारतीय संस्कृती मध्ये सण, उत्सव, वैकल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. या महिन्यात संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार व उत्साहदायी असते.उन्हातील पाऊस आणि पाऊसातील ऊन पाहिले की मन भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवागार होऊन जातो. कधी अचानक पाऊस पडतो तर कधी अचानक ऊन पडते.श्रावण महिन्यात रिमझिम पडणाऱ्या पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. आकाशातून बरसणाऱ्या सरींमध्ये भिजून जावे असे अनेकांना वाटते. श्रावणातील अशा अल्हाददायक वातावरणामुळे झाडे, फुले, पिके अगदीच ताजेतवाने दिसतात. आकाशामध्ये अधून मधून रंगबेरंगी इंद्रधनुष्य पाहून तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. भाविक मोठ्या उत्साहात हे सर्व सण साजरे करत असतात.
या श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी येणार्या आषाढी अमावास्येला दीप अमावस्या म्हणून संबोधले जाते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ आणि लख्ख केले जातात. त्यांची पूजा केली जाते. यापुढे श्रावणातील व्रत वैकल्यांना सुरुवात होते म्हणून दिवे स्वच्छ करण्याची प्राचीन काळापासून परंपरा असावी. महाराष्ट्रात या दीप अमावस्येलाच गटारी अमावस्या म्हटले जाते. गटारी अमावस्या हा शब्दप्रयोग का केला जात असावा याबद्दल जास्त ऊहापोह न केलेला बरा. वास्तविक पूर्वी या अमावस्येच्या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार वर्ज केला जात असे. कारण या पुढे श्रावण महिन्यात सण-वार, व्रत-उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच या दीप अमावास्येच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. अनेक हिंदू श्रावण महिन्यात मास-मदिराचे सेवन करणे टाळतात. म्हणूनच श्रावण महिना सुरु होण्याच्या एका दिवसापूर्वी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.
श्रावण महिन्यातील वातावरणात मांसाहार पचायला कठीण असतो. हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. असे अन्न शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या रानावनात याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. पुढे साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी, पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दिपपूजन करून, अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप- अमावस्या साजरी केली जाते.
महाराष्ट्रीयन लोकांसाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. बरेच लोक महिनाभर उपवास करतात, ज्यात ते एकभुक्त अर्थात एकदाच आहार ग्रहण करणे, काहीजण फळांचा आहार घेणे अथवा वेगवेगळ्या पद्धतीने आहार घेऊन या महिन्यात व्रत नियम, आचार- विचारांचे पालन केले जाते. थोडक्यात, श्रावण महिन्याला भारतीय संस्कृती मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- प्रमोद पाटील,
पालघर
Comments
Post a Comment