दिव्यांगांचा आधारवड हरपला...
पालघर टाइम्सचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे सल्लागार, आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोक नाना चुरी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मात दुःखद निधन झाल्याची वार्ता समजली. ही दुःखद वार्ता एकताच धक्काच बसला.
पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून चुरी काकांच्या सोबत काम करण्याचा योग आला. ते या संस्थेचे सल्लागार होते. अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे चुरी काका संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात स्वतःला झोकून देत होते. सामुदायिक विवाहाची संकल्पना समाजात रुजवण्यासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात पालघरमध्ये केली. दिव्यांग व्यक्ती शक्यतो विवाहास तयार होत नाहीत. या दिव्यांगांना विवाह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सामुदायिक विवाह संकल्पनेतूनच दिव्यांगांच्या सामुदायिक विवाहाची संकल्पना पुढे आली. वंदे मातरम संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून चुरी काकांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडत आहे. या दिव्यांगांच्या सामुदायिक सोहळ्याच्या वेळी ते आपल्या घरातील एखाद्या लग्नसमारंभा सारखेच जबाबदारी घेऊन तो सुरळीत पार पडण्यासाठी झटत होते. विशेषतः लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या वर्हाड्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह धावपळ करत असत. विवाहित जोडप्यांसोबत एखाद्या फोटोसाठी त्यांना बोलावून आणावे लागत असे.अशाच प्रकारे संस्थेच्या गोड दिवाळी, स्वयंरोजगार शिबिर, पेन्शन योजना, आरोग्य शिबिर,विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप, वर्धापन दिन कार्यक्रम आदी उपक्रमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे "दिव्यांगांचा एक आधारवड हरपला" अशी भावना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्त करत आहेत.
खरं पाहता, चुरी काकांच्या बरोबर माझी ओळख सन 2003 मध्ये झाली. जेव्हा मी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो, तेव्हा मंडळाच्या कामानिमित्त चुरी काकांशी संबंध आला. त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क येतच राहिला. ते उत्कृष्ट मार्गदर्शक होते. समाजात अशी माणसे खूप दुर्मिळ असतात. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, लहान-मोठा अशी दरी त्यांना मान्य नव्हती. त्यांनी आपलं उभे आयुष्य सामान्यांच्या सेवेसाठी वेचले. सामान्यांचे ते कैवारी होते.
त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा संतोष आणि विवाहित कन्या असा परिवार आहे. चुरी काकांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात वंदेमातरम परिवार सहभागी आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Comments
Post a Comment