Skip to main content

निरामय जीवनासाठी गुरू- शिष्याचे नातं अत्यावश्यक- प्रमोद पाटील


गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
निरामय जीवनासाठी गुरू- शिष्याचे नातं अत्यावश्यक-  प्रमोद पाटील

करितो आदरे । सद्गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.
धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन
धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी
थोर धन्वंतरी । मृत्युंजय.
धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन
ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.
धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता । सोडवी जो.
धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास
धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे
फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य
धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध.
धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही!
सामान्यांना काही । अर्थ आहे!
सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे 
भक्तिभाव नेणे । ऐसे होवो.
सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान 
दासाचे दासपण । नष्ट होवो.
सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य
- विंदा करंदीकर
        वरील काव्यपंक्ती मानवी जीवनात गुरूचे महत्व काय आहे ते अधोरेखित करत आहेत.भारतीय संस्कृतीमध्ये गुरु- शिष्य हे अत्यंत महत्त्वाचं नातं मानलं जातं. गुरू ही संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. गुरुचं महत्व हे देवापेक्षा यत्किंचितही कमी नाही. वेदांमध्ये गुरूचा उल्लेख हा साक्षात परब्रम्ह म्हणून केला गेला आहे. या संकल्पनेला साजेशीच गुरुची परंपरा आपल्याला दिसून येते. 

           आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेसुद्धा म्हटले जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

          केवल शालेय शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य असे नव्हे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करणारा गुरू असतो. तर दुसऱ्याचे विचार जीवनात अंगीकारणारा हा शिष्य असतो. थोडक्यात, गुरुची परंपरा सुरू राहण्यासाठी आवश्यक असतो तो शिष्य. हा शिष्य ही परंपरा फक्त पुढे नेत नाही तर ती अधिकाधिक समृद्ध करत जातो. याचीच असंख्य उदाहरणं आपल्याला जगभर दिसतील. गुरू- शिष्याच्या अशाच काही जोड्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात महान असं कार्य केलंय. त्या विषयाला एक आगळं वेगळं वलय या गुरुशिष्यामुळे प्राप्त झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यापैकी द्रोणाचार्य- अर्जुन, सांदिपनी ऋषी- श्रीकृष्ण, चाणक्य- चंद्रगुप्त, समर्थ रामदास - शिवाजी महाराज, अरस्तु- सिकंदर, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस अशा गुरु-शिष्यांच्या जोड्या खूपच प्रसिद्ध आहेत..

      मार्च महिन्यापासून आपल्या देशामध्ये कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असून देशातील शाळा देशातील शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा,  महाविद्यालये, विविध शिक्षण संस्था जरी बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवावे अशा प्रकारचे शासनाचे निर्देश आहेत. शिक्षण ही प्रक्रिया एकाकी नसून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या विचारांचे आदान-प्रदान करणे हे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत असेल पण त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टी मिळू शकत नाही. किंबहुना काही तज्ञांच्या मते, ऑनलाईन शिक्षण पद्धतीने गुरू-शिष्याच्या संबंधांमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

          ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये ऑनलाईन शिक्षण हा पर्याय असू शकत नाही. विशेषतः ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेले अँड्रॉइड मोबाइल किंवा लॅपटॉप ग्रामीण भागातील सर्व पालकांकडे उपलब्ध नाहीत. दोन, तीन अपत्य असतील तर त्या प्रत्येकाला अँड्रॉइड मोबाईल आणि त्यासाठी नेटचे  रिचार्ज मारणे हे हातावर पोट असणाऱ्या लोकांना कसे शक्य आहे? त्याच्यातच जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये बहुतांश भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. त्यामुळे कनेक्टिव्हीटीसाठी फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. अशीही ऑनलाईन शिक्षण पद्धतीही विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पण या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सौजन्यशीलता, नेतृत्व, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आदी गुणांचा विकास होताना दिसत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सर्वच काम धंदे बंद असल्याने बहुतांश लोकांवर बेकारीची वेळ आलेली आहे. लोकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहेत. 
           आपल्या देशात लवकरच नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात पालक, माजी विद्यार्थी, परिसरातील वरच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी, डॉक्‍टर, समुपदेशक, व्यावसायिक, उद्योजक, कलाकार, कारागीर, निवृत्त शिक्षक आणि अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि इतर व्यक्ती आणि संस्था अशा समाजाच्या विविध घटकांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत शक्‍य त्या सर्व मार्गांनी "मिशन मोड'मध्ये सहभाग घ्यावा असे म्हटले आहे. नवीन धोरण जाहीर होण्याची वाट न पाहता निश्‍चित स्वरूपाचा कृतिकार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. हे सर्व करताना स्थानिक पातळीवर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे याचे भान सोडून चालणार नाही. पालक आणि समाजाचे विविध घटक "विद्यार्थिमित्र' या भूमिकेतून कार्य करतील, तर शिक्षक मार्गदर्शक आणि समन्वयक या भूमिका पार पाडतील. निश्चितच कोरोनाच्या  संकटावर मात करून शिक्षण ही प्रक्रिया निरंतर राहण्यासाठी मदत होईल असे मला वाटते.
          विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी, त्यांच्यामध्ये विविध नितीमुल्य रुजवण्यासाठी, त्यांना भावी सुजाण नागरिक बनवण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन अमूल्य आहे. थोडक्यात निरामय जीवनासाठी जीवनामध्ये गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- प्रमोद भालचंद्र पाटील
9049052555
 एम ए बी एड
  राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...