Skip to main content

तरुणांचा दीपस्तंभ... - प्रमोद पाटील

                तरुणांचा दीपस्तंभ ,  
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


          19 मे 1968 रोजी तत्कालीन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाचा 52 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रथमतः मंडळाच्या सर्व आदरणीय आद्य संस्थापकांना मानाचा मुजरा. तसेच सर्व आजी- माजी पदाधिकारी, विविध दाते, जाहिरातीदार आणि तमाम बंधू-भगिनींना वर्धापन दिनाच्या खूप- खूप शुभेच्छा!
     एखादी संस्था अविरतपणे 52 वर्ष जोमाने कार्य करत असते तेव्हा अशा संस्थेचे कार्य हे निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी, नवी दिशा देणारं असतं. एखाद्या दीपस्तंभासारखे असते. मंडळाची स्थापना करताना मंडळाच्या आद्य संस्थापक आणि कार्यकर्त्यांनी पुढील काळाची पावले ओळखून अत्यंत दूरदृष्टीने विचार करूनच स्थापना केली. आज मंडळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून समाजातील युवक-यवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. शेतकरी दौरा अथवा मेळाव्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आधुनिक शेती कशा पद्धतीने करावी याचे तंत्र दिले जाते. शाळकरी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षे बरोबरच विविध स्पर्धा परीक्षांना सहजच कसे सामोरे जावे याबाबत आत्मविश्वास दिला जातो. त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. रक्तदान अथवा आरोग्य शिबिरातून गरजूंना योग्य त्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विविध प्रकारच्या आपत्तीत सापडलेल्या आपदग्रस्तांना मंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे. हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून विविध दात्यांच्या स्मरणार्थ अथवा नावे शिष्यवृत्ती दिली जात आहे. वनराई बंधारे, वृक्षारोपण या सारख्या उपक्रमांचा विचार केला तर सहजच आपल्या लक्षात येते की, मंडळाच्या माध्यमातून "समाजाला एकसंघ" ठेवून प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम अविरत सुरु आहे. मंडळाच्या व्यासपीठावरून अनेक कार्यकर्ते घडले आणि असंख्य कार्यकर्ते घडत आहेत. या मंडळाचा एक माजी पदाधिकारी म्हणून निश्चितच मला सार्थ अभिमान आहे.
         गेल्या दोन महिन्यापासून सारे जग कोरोना विषाणूच्या महामारीमुळे हताश झाले आहे. सुरुवातीला केवळ चीन सारख्या देशात मर्यादित असलेली कोरोनाची साथ फेब्रुवारी महिन्यापासून इटली, अमेरिका, स्पेन आदी जगभरातील प्रगत देशात पसरली. आपल्या देशात ही या साथीने हळूहळू प्रवेश केला आहे. 4 मार्च रोजी आपल्या देशात पहिला कोरोना बळी सापडला. तदनंतर देशातील बऱ्याच राज्यात या रोगाने जोरदार शिरकाव केला आहे. 1897 मध्ये म्हणे प्लेगच्या साथीने महामारी झाली होती. गावंच्या गावं या माहामारीत गेली होती असे ऐकले होते, वाचले होते. त्या तुलनेत कोरोना जरा जास्तच वरचढ दिसतो. एक विशेष बाब म्हणजे या साथीला सामोरे जायला आजचे जग खूपच अधिक सक्षम जरी वाटत असले तरीसुद्धा या संसर्गापुढे सर्वांनीच गुडघे टेकले आहेत. कोरोनासारख्या साथीच्या रोगांची संकटे मानवी मनाला अस्वस्थ करून घाबरून टाकतात हे जरी खरे असले तरी, मानवी मनातील "स्वत:पलीकडे बघण्याच्या भावनेलाही" ती जागृत करत असतात. मानवजातीचा साथीच्या आजारांचा आजवरचा इतिहास पाहता, या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद वर्षाचा कालावधीही लागू शकतो. कोरोनासारखे साथीचे आजार केवळ माणसाच्या शरीरावरच हल्ला करतात असे नाही, तर ते "समाज जीवनाच्या" विविध महत्वाच्या क्षेत्रांवरही प्रभाव टाकून जातात हे मात्र विसरता कामा नये.  
       कोरोनामुळे पुढील काही काळात फार मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, कारखाने बंद पडून जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. बहुतांश लोकांना ( विशेषतः परदेशी) आपल्या नोकऱ्या, आपला व्यवसाय यांना मुकावे लागू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे. हे कटू सत्य आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांचा विचार केला तर पुढील काळामध्ये कशा पद्धतीचे आर्थिक संकट उभे राहू शकते याचा ट्रेलर आपल्यासमोर आहे. सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे परप्रांतातील असंख्य (लोंढे चे लोंढे) मजूर, कामगार, व्यवसायिक आपल्याला जसे जाता येईल तसे आप-आपल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे लॉक डाऊन नंतर सुद्धा काही व्यवसाय किंवा नोकऱ्यांमध्ये मजुरांची कमतरता भासू शकते. म्हणूनच कोरोना हे संकट न मानता त्यामुळे आपल्याला जणूकाही संधीच मिळालेली आहे असे मला वाटते. यानिमित्ताने आज अनेक छोटे मोठे धंदे, नोकऱ्या आपल्यासमोर उभ्या आहेत. आपण फार मोठी अपेक्षा न करता जिथे संधी मिळेल तिथे प्रवेश करून ते क्षेत्र आता काबीज करायला हवे. आपण एकदाच श्रीमंत होण्याचे दिव्या स्वप्न न पाहता. छोट्या- मोठ्या व्यवसाय, नोकरीतून परिपूर्ण आणि समृद्ध जीवन कसे जगु शकू याचा आता विचार करायला. जसे इस्त्रीवाला, हार-तुरे वाला, फळे वाला हे व्यवसाय जरी छोटे-छोटे दिसत असले तरी अशा व्यवसायातून खूप मोठे उत्पन्न मिळू शकते. आपल्या बहुतांश लोकांकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आपण उत्पन्न घेऊ शकतो. केवळ अंधानुकरण करून शहरांकडे जाण्याचा आपला ओघ थांबला पाहिजे. शहरांकडे मिळणारे आपले उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसतो का? हे आधी तपासावे. कोरोना सारखे आजार आल्यानंतर शहरातून आपल्याला पुन्हा गावाकडेच धाव घ्यावी लागते. गावात मिळणारी शुद्ध हवा, ताज्या पालेभाज्या, प्रदूषण विरहित वातावरण हे सर्व पाहिले की "गड्या आपला गाव बरा" ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होते. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करायला हवा.
       सध्या कोरोनामुळे आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कुणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. "जगण्यातील सहजता" गेली आहे. अगदी मदत करणारा हात देखील कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू देताना वस्तू बरोबर काय देईल याची शंका घेऊन जगतोय आपण. 

     पूर्वी शिंक आली की वाटायचं  कोणीतरी आठवण काढली..

     आता शिंक आली की वाटतं ..

        आपली फाईल बाहेर काढली की काय...

माहीत नाही किती दिवस चालेल हे, पण "जगण्यातली सहजता" किती महत्वाची आहे हे आता आपल्याला कळले. कोरोना च्या या लढाईत आपल्या समाजातील अनेक डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील बंधू-भगिनी निकराचा लढा देत आहेत. त्यांचा निश्चितच आपल्याला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात याही संकटावर मात होईल. मात्र तोपर्यंत काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे.
          दरवर्षी मे महिन्यामध्ये होणारे मंडळाचे वार्षिक अधिवेशन आणि सभा लॉक डाऊनमुळे मे महिन्यात घेता येणे शक्य नाही. या बाबतीत मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी विचार-विनिमय करून योग्य तो निर्णय घेतीलच. वर्धापन दिनाच्या निमित्ताने तरुणांना एकच आवाहन करावेसे वाटते की, आपण आपला अमूल्य वेळ वाया न घालवता आलेल्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊन अथक परिश्रम करून आपल्याबरोबरच समाजाचा विकास करून नाव उज्ज्वल करावे.
 धन्यवाद!
जय कुणबी!

              आपला, 
- 📘प्रमोद भालचंद्र पाटील
       माजी अध्यक्ष/ माजी विश्वस्त
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...